शून्यापासून सुरु झालेला प्रवास शेवटी शून्य होऊन जातो.आयुष्याचं कोडं. कधीच सुटत नाही पण त्यातून माणसं मात्र उलगडत जातात. शेवटी अगणित यात्रा असते हे किती क्षणाचं आयुष्य असतं नाही. बघता बघता काळ सरकत जातो आणि शेवटची मांडणी करून उत्तराची वाट न बघता मावळतिचा पूर्णविराम देतो तो काळ .....
भारतीय शिल्पकला ही अत्यंत प्राचीन असून वात्सायनाने शिल्पकलेच्या षडांगांची माहिती दिलेली आहे. कुठलीही कलाकृती सौंदर्याभिरुचिपूर्ण तेव्हाच बनते, जेव्हा वर्णिलेली षडांगे त्या कलाकृतीत असतातच. रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य योजनम्, सादृश्यं आणि वर्णिका भंग ही सहा अंगे एकाच कलाकृतीत जेव्हा अंतभूर्त होतात, तेव्हा ती कलाकृती समृद्ध होते. स्मृतिप्रवण ठरते आणि रसिकमनाचा ठाव घेते.
मला वेगवेगळी गावं फिरण्याचा छंद आहे. त्या त्या गावाची भाषा समजून घेण्याचे व्यसन आहे. गाव बोलते मायेने. मंदिरातून बोलते, मूर्तीतून बोलते, एखाद्या सुरकुतलेल्या थरथरणा-या हातातून बोलते, देवाला अर्पण केलेल्या भाकर तुकड्यातून बोलते, गाभाऱ्यात पसरलेल्या भंडा-यातून बोलते, गुरं राखणा-या घुंगुरकाठीतून बोलते.... ती भाषा समजायला हवी बस्स...
त्या संवादाचे फोटो तर आपण क्लिक करत असतोच....मात्र घरी आल्यावर शांतपणे खूप वेगळ्याच फ्रेम सापडतात.... खूप निराळ्या मात्र एकदम जिवंत असणाऱ्या फ्रेम्स....
आपण मंदिरे, मूर्ती, स्थापत्य याचे फोटो काढत असतोच असतो मात्र काही जिवंत क्षण आणि संवेदना अलगदपणे आपल्या हातात येतात...
वेरुळ हे मूर्तिमंत काव्य आहे. इथले दगड बोलतात आपल्याशी. छिन्नीचा हर एक घाव म्हणजे एकेक अक्षर आहे. ही शिल्पं म्हणजे केवळ मूर्ती नाहीत, तर कहाण्या आहेत. अनसंग सॉंग्ज आहेत.
इथलं काव्य, इथलं संगीत, इथलं नृत्य पकडण्याचा प्रयत्न कितीजणांनी केला असेल? मुळात ते समजून तरी घेण्याची तळमळ आपल्याकडे आहे?
नृत्य हे भारतीय संस्कृतीचं अविभाज्य अंग आहेच पण त्यातली परिपूर्णता म्हंजे काय हे आकळायला नर्तक - नर्तकीनी इथली शिवाची तांडवनृत्य शिल्पं समजून घेऊन पहायला हवीत. त्यात लपलेल्या इमोशन्सचा वेध घेता यायला हवा. तसं झालं तर लवचिकता, ग्रेस/सहजसुंदरता यांचे आयाम बदलून जातील, त्यांची नृत्यकला समृद्ध होईल.
ध्यास वेरुळ
श्वास वेरुळ
अशी अवस्था व्हावी इतकं वेरुळ अफाट आहे.
मी वेरुळमधून बाहेर पडलो तर वेरुळच कायमचं मनांत वस्तीला आलंय.
वेरुळ हे मूर्तिमंत काव्य आहे. इथले दगड बोलतात आपल्याशी. छिन्नीचा हर एक घाव म्हणजे एकेक अक्षर आहे. ही शिल्पं म्हणजे केवळ मूर्ती नाहीत, तर कहाण्या आहेत.
इथे शरीरशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, वास्तुशास्त्र अशी अनेक शास्त्रं आहेत, गणित आहे, तत्वज्ञान आहे, मानवी भावनांचं अतिशय तरल असं प्रकटीकरण आहे.
इथल्या प्रत्येक आकृतीला लय आहे, नाद आहे. अनाम कारागिरांनी साकार केलेलं हे शिल्पायन बघतांना भान विसरायला होतं, डोळे भरत रहातात, हा संपन्न वारसा जतन करण्यासाठी काहीतरी करावं म्हणून जीव तडफडतो.